पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या सहकार्याने अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित जागतिक चिमणी दिनाच्या औचित्याने ‘चला चिऊ वाचवू अभियाना’ अंतर्गत प्रमुख पाहुणे आणि वक्ते स्वानंद केसरी यांचे ‘जैवविविधतेचे उत्सव’ हे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अभियानाचे हे दहावे वर्ष आहे. सिटीझन सायन्स (लोकविज्ञानातील) तज्ज्ञ स्वानंद केसरी यांनी विविध जैवविविधता नोंदीचे प्रकल्प राबवले आहेत आणि त्यांच्या या व्याख्यानात ते जैवविविधतेच्या शास्त्रीय नोंदी सर्व सामान्यांनी कशा कराव्यात आणि या नोंदींच्या आधारे कोणते उपक्रम राबवले जातात, या नोंदींचा आपल्या जीवनाशी काय संबंध याविषयी उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले. केसरी यांनी जैवविविधतेच्या नोंदी का ठेवाव्यात, याचे स्पष्ट व सोदाहरण विवेचन केले.
स्वानंद केसरी म्हणाले, ”पुण्यात जनसामान्यांनी सुमारे १०० हून अधिक मुंग्यांच्या प्रजातींची नोंद केली आहे. जैवविविधतेच्या नोंदींच्या समृद्धतेचे महत्त्व दाखवले. लोकविज्ञानातून संकलित होणाऱ्या माहितीचा शास्त्रज्ञ मोठा उपयोग होतो. तिथल्या परिसरातील जैवविविधतेची नोंद तर होतेच त्याबरोबर पर्यावरणात होणारे बदल देखील समजतात. त्यामुळे मानव पर्यावरण संवर्धनासाठी योग्य ते उपाय करता येतात. पर्यायाने मानवी जीवन सुकर होऊ शकते. विविध ठिकाणी तज्ञ शास्त्रज्ञांना हजारो निरिक्षण नोंदी घेण्यास आयुष्य पुरणार नाही. कोणतेही औपचारिक शाश्त्रीय शिक्षण न घेतलेल्यांनी देखील घेतलेल्या हजारो-लाखो नागरिकांनी केलेल्या निरिक्षण नोंदी अभ्यासासाठी मोठ्या उपयोगी आणि वेळेची बचत करु शकतात. असे सामान्य नागरिकांनीही केलेल्या नोंदी ठरु शकतात विशेष”
अलाईव्ह आयोजित ‘चला चिऊ वाचवू अभियान’ अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धेला यंदा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. स्पर्धेत महाराष्ट्रातून पुणे, मुंबई, ठाणे छत्रपति संभाजी नगर, जालना, लातूर, सातारा, सांगली, रत्नागिरी इथून सहभागी झाले. तर देशातून दादरा नगर हवेली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि पश्चिम बंगाल येथून आणि परदेशातून दुबई, जर्मनी, कॅनेडा आणि ब्राझिल येथूनही विविध स्पर्धेत सुमारे चारशे लोकांनी सहभाग नोंदवला.
चिमणी “गोष्ट माझी-गोष्ट चिऊची” कथा आणि “चिऊताईची कविता” या स्पर्धां मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी अश्या चार भाषेत घेण्यात आल्या होत्या. कथा स्पर्धा विजेत्यांना किशोर, खुला आणि ज्येष्ठ गटात ‘राष्ट्रीय कीर्तनकार ओतूरकर बुवा कथा पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. चिऊताईची कविता स्पर्धा विजेत्यांना कुमार, खुला आणि ज्येष्ठ गटात ‘विजयाबेन वाघेला काव्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. चिमणी चित्रकला स्पर्धीतील विजेत्यांना बाल, किशोर, खुला आणि ज्येष्ठ गटात ‘श्रावण कांबळे चित्रकला पुरस्कार’ देऊन गौरवान्वित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार कासार ह्यांनी अलाईव्हच्या उपक्रमाला शुभेच्छा देताना असे उपक्रम भविष्यासाठी कसे उपयुक्त आहेत ते विषद केले. सोबतच भारतभरात वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे प्रयोग करतानाचे आलेले अनुभवही त्यांनी मांडून जनसामान्यांचा विज्ञानातील सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. भालचंद्र पुजारी यांनी अलाईव्ह द्वारे आयोजित चला चिऊ वाचवू अभियान विषयी प्रास्ताविके व सूत्रसंचालन केले आणि अलाईव्ह ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष उमेश वाघेला यांनी संस्थेच्या कार्याविषयी ओळख करुन दिली. संस्थेचे सचिव चैतन्य राजर्षी यांनी स्पर्धा परिक्षण समितीचे काम पाहिले तसेच आभार मानले. तसेच विश्वस्त राजेंद्र कांबळे व रविंद्र गायकवाड यांनी संयोजन केले. या अभियानाला साई इंजिनिअर्ससचे संचालक हलगौडा ओमकार, दीक्षा एक्स्पोर्टचे संचालक धनंजय शेडबाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रतिक्रिया व्यक्त करा